प्रभाग २१ मधील गुणवंतांचा भव्य सत्कार; २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप – नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी : श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक २१ मधील इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात नगरसेवक श्री संदीप वाघेरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी डॉ. गणेश शिंदे, स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे, नगरसेविका निकिता कदम, प्रियांका कुदळे, नगरसेवक विकास साने, माजी नगरसेवक श्रीरंग शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घुले, ज्ञानोबा गव्हाणे, सुधाकर यादव, उत्तम कुदळे, शांताराम सातव, रवींद्र वाघेरे, सतीश वाघेरे, प्रविण कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गणेश शिंदे म्हणाले, “यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावरच विद्यार्थी मोठी स्वप्ने साकार करू शकतात. शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रभावी साधन असून, स्पर्धेच्या युगात केवळ गुण नव्हे तर कौशल्य, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीही तितकीच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द कायम ठेवून आपल्या पालकांसह समाजाचे नाव उज्ज्वल करावे.”
यावेळी मनोगत व्यक्त करताना संदीप वाघेरे म्हणाले, “प्रभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळावे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू. गुणवंतांचा गौरव करण्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
या प्रसंगी इयत्ता १० वीतील दिया संतोष रतनानी, गौरी राहुल अडपवार, श्वेता शरद पाचनकर तसेच इयत्ता १२ वीतील लाविना प्रकाश कटारिया, श्रीर्षा श्रीपाद कुलकर्णी, यश राम मदने या गुणवंत विद्यार्थ्यांचा लॅपटॉप व टॅब देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय इतर गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमात ज्युनिअर केजी ते इयत्ता ८ वीपर्यंतच्या सुमारे २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त करत युवा मंचाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन युवा मंचचे अध्यक्ष हरीष वाघेरे, किरण शिंदे, जितेंद्र वाटकर, रंजना जाधव आणि श्रद्धा देडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेखर अहिरराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
