पिंपरी चिंचवडपुणेबातम्या

“मीमांसा” मुळे व्यावसायिक जगाचा प्रत्यक्ष अनुभव – डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएम मध्ये राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज “मीमांसा” ची प्रथम फेरी संपन्न 

राष्ट्रीय पातळीवरील ४८ संघांचा बिझनेस केस चॅलेंज मध्ये सहभाग 

पिंपरी, पुणे ;व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह प्रत्यक्ष कंपनी आस्थापनांमध्ये चालणाऱ्या कामाचा अनुभव मिळणे आवश्यक आहे. या व्यावसायिक जगातील गुंतागुंत आणि अनिश्चिततेचा प्रत्यक्ष अनुभव आणि शिक्षण घेण्याची संधी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असणाऱ्या “मीमांसा” या व्यासपीठाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे. यामुळे व्यवस्थापन व्यावसायिकांमध्ये विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होईल. “मिमांसा २०२६” चे उद्दिष्ट व्यवस्थापन, शिक्षण आणि वास्तविक व्यावसायिक आव्हाने यांच्यात एक अर्थपूर्ण दुवा निर्माण करणे, विद्यार्थ्यांना पारंपरिक उपायांच्या पलीकडे विचार करण्यास प्रोत्साहित करणे, आजच्या गतिमान व्यावसायिक वातावरणातील अनिश्चिततेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास विकसित करणे हे आहे असे एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले. 

  एसबीपीआयएम येथे राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज “मीमांसा २०२६” ची प्रथम ऑनलाइन फेरी पूर्ण झाली. या स्पर्धेची ऑफलाईन अंतिम फेरी ३० सप्टेंबर रोजी एसबीपीआयएम कॅम्पस मध्ये होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या प्रकल्पास स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, रोख २० हजार रुपये; द्वितीय क्रमांकाच्या प्रकल्पास स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या प्रकल्पास स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, १० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र देण्यात येणे येईल.

    या स्पर्धेत विविध राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामांकित ४८ संघांनी सहभाग घेतला होता. पुणे, मुंबई, बंगळूर, सुरत, ग्रेटर नोएडा, नाशिक, अकोला, अकोट आणि धुळे यांसारख्या शहरांसह महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना समकालीन उद्योग आणि व्यावसायिक स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारे व्यासपीठ प्राप्त झाले आहे. तसेच तज्ञांच्या प्रतिष्ठित पॅनेल समोर नाविन्यपूर्ण व व्यावहारिक उपाय सादर करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेने विश्लेषणात्मक विचार, समस्या निराकरण, धोरणात्मक निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि प्रभावी व्यावसायिक संवाद यांसारख्या महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला. पहिल्या फेरीचे मूल्यांकन उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीने केले. 

    या बाह्य तज्ज्ञ समितीमध्ये ज्येष्ठ मानव संसाधन आणि व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. कॅप्टन सी. चितळे, सिमेन्स कंपनीचे माजी महाव्यवस्थापक डॉ. सुबोध संत, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक डॉ. शैलेश कासंदे, व्हीटन ॲडव्हायझर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर देशमुख, विपणन व्यवस्थापनातील वरिष्ठ तज्ज्ञ प्रा. डॉ. मिलिंद मराठे, निकमार चे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. अतुल फेगडे यांचा समावेश होता. तसेच अंतर्गत तज्ज्ञ समितीमध्ये डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. भूषण परदेशी, डॉ. रूपाली कुदरे, डॉ. शिवाजी देसाई, डॉ. अनिशकुमार कारिया, डॉ. काजल महेश्वरी आणि डॉ. संतोष शिंदे यांचा समावेश होता.

     या समितीने कॉर्पोरेट नेतृत्व, मानव संसाधन, वित्त, विपणन, उच्च शिक्षण आणि व्यवस्थापन या क्षेत्रांतील विविध दृष्टिकोन याचे परीक्षण केले.

     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

   संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, प्रा. डॉ. भूषण परदेशी, डॉ. रूपाली कुदरे, डॉ. शिवाजी देसाई, डॉ. अनिशकुमार कारिया, डॉ. काजल महेश्वरी, डॉ. संतोष शिंदे, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, प्रा. सोनाली मोहिते यांनी ऑनलाइन स्पर्धेचे संचालन केले.

    आयोजनात डॉ. संजय गायकवाड, डॉ. पद्मलोचना बिसोयी, डॉ. विशाल वाघ, डॉ. इराम अन्सारी यांनी सहभाग घेतला आहे.