बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई: परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतींचा आदर राखत पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील निवासस्थान ‘वर्षा’ येथे श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहकुटुंब पारंपरिक पद्धतीने बाप्पाची पूजा-अर्चा करून आरती केली.

श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील तसेच देशभरातील गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनात आनंद आणून सर्व विघ्ने दूर करावीत. देश, राज्य, नागरिक आणि बळीराजासमोरील अडचणी दूर होऊन सर्वांना नवचैतन्य, सामर्थ्य आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, आनंद आणि परंपरेचा उत्सव आहे. सर्व गणेशभक्तांनी हा उत्सव आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करावा. मात्र, गणेशोत्सवाच्या उत्साहाबरोबरच पर्यावरणाचे भान राखण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून तो समाजाला एकत्र आणणारा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणारा उत्सव असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले. परंपरेचे जतन, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधत सर्वांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.