पिंपरी चिंचवडपुणेबातम्या

विद्यार्थी भारताच्या उज्वल भविष्याचे शिल्पकार – पद्माताई भोसले

“आंतरराष्ट्रीय शाळा मान्यता परिषद”च्या पुरस्काराने एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा गौरव

पिंपरी, पुणे (दि. ०५ सप्टेंबर २०२६) आजचे विद्यार्थी भारताच्या उज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत. त्यांना ज्ञान, मूल्य, कौशल्य आणि आत्मविश्वासाने समृद्ध करण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे एस. बी. पाटील पब्लिक स्कूल नेहमी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. याची योग्य दखल घेऊन “आंतरराष्ट्रीय शाळा मान्यता परिषद”च्या वतीने एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला यावर्षी राष्ट्रीय पातळीवर तीन पुरस्कार मिळाले हे अभिमानास्पद आहे असे पीसीईटी उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी सांगितले. 

      “आंतरराष्ट्रीय शाळा मान्यता परिषद”च्या (इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ स्कूल ऍक्रेडिशन) वतीने एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला “शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२६” (अकॅडमी एक्सलन्स), स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांना “उत्कृष्ट अध्यापन व प्रशासकीय कौशल्य पुरस्कार २०२६” आणि मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांना “उत्कृष्ट प्रशासकीय व प्रेरणादायी कौशल्य पुरस्कार २०२६” दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला. १०+२ या शालेय शिक्षण पद्धतीत उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे. पारंपरिक मूल्यमापनाच्या पलीकडे जाऊन संस्थात्मक विकास, सहकारी मूल्यमापन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सातत्यपूर्ण सुधारणा यावर विशेष भर देणाऱ्या शालेय संस्था, मुख्याध्यापक, प्रशासक यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी देश पातळीवर अंतिम फेरीमध्ये ३०० प्रवेशिकांची निवड झाली होती, त्यातून एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला एकूण तीन पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार शाळेसाठी आणि संस्थेसाठी अभिमानाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहेत. उत्कृष्टता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उद्देश पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या शाळेच्या वचन बद्धतेची यामुळे पुनर्प्रचिती येते असे पीसीईटी उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी पुरस्कार्थींचे अभिनंदन करताना सांगितले. 

      या उल्लेखनीय यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव, विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांना देशभरातून आलेल्या पुरस्कार्थींसमोर ‘आजच्या काळातील मानसिक आरोग्याचे वाढते महत्व’ या विषयावर व्याख्यान देण्याचा बहुमान मिळाला. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणांवर येणारा मानसिक ताण तसेच पालकांच्या अपेक्षांवर होणारा विपरीत परिणाम याविषयी त्यांनी विचार व्यक्त केले.